चार वर्षांपूर्वी आम्ही कॉलेजमध्ये असताना ढाकचा ट्रेक केला होता , पण तेव्हा वर गुहेपर्यंत काही जायचं धाडस झालं नव्हतं. पुन्हा एकदा यावेळी ढाक ला जायचं ठरलं आणि आनंद, भीती दोन्ही मनात दाटल्या. एका गाडीवरून दोघे असे दहाजण लोणावळ्याच्या दिशेने निघालो. मस्त रिकामा रस्ता पाहून अर्धा तास एका गाडीचा ताबा मी घेतला. साधारण संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही जांभिवली या गावात पोचलो. पुण्यापासून साधारण ५०-६० कि.मी. वर आहे हे गाव. याच गावापासून चालायला सुरुवात करायची होती. सूर्य मावळायच्या आत गुहेत पोचणं गरजेचं होतं म्हणून आम्ही गाड्या तिथल्याच एक घरी लावून पिठलं-भाकरीची सोय करून निघालो. आमच्यातील २-३ जण परत येऊन ही पिठलं-भाकरी नेणार होते. उन्हं कमी असल्यामुळे उकाडा तसा जाणवत नव्हता , पण बऱ्याच दिवसात ट्रेक केला नसल्यामुळे दम बराच लागत होता आणि त्यामुळे चालायचा वेगही मंदावत होता.
चालढकल करत ७ च्या सुमारास आम्ही गुहेच्या पायथ्याशी पोचलो. खरी कसोटी तर आता इथून पुढे होती. डोंगरावर असलेल्या दगडांच्या खाचात जागा सापडेल तिथे हाताने पकडत पकडत एक एक पाय पुढे न्यायचा आणि असं थोडं पोटावर झुकून तिरकं चालायचं. अंधार पडल्यामुळे खाली किती खोल दरी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच कळले. :) पण त्यामुळे वाटली असती त्यापेक्षा कमी भीती वाटली. नाहीतर भीतीने गर्भगळीत होऊन मी तिथेच ठाण मांडून बसले असते. तिथून थोड पुढे गेलं की दगडालाच आकार देऊन पायऱ्या केल्या आहेत. आणि मधे मधे आधारासाठी लोखंडी सळ्या लावल्या आहेत.
यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे दोरीच्या सहाय्याने दोन बांबू ठेवले आहेत त्यावरच्या खाचांवर पाय ठेवत वर चढायचं. कमी उंची आणि वजनामुळे मला हा पल्ला फारच त्रासदायक ठरला कारण या लाकडावरच्या खाचा बऱ्याच अंतरावर होत्या. पण आमच्या वानर वंशाच्या मित्रांनी मदत केली आणि एकदाची मी गुहेत पोचले. मनात खूप आनंद आणि त्याच वेळी भीती अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. इतक्या अवघड जागी आलेल्याचा आनंद आणि आता उद्या पुन्हा त्याच वाटेवरून उतरायच कसं याची भीती.
वर २-३ खोल्यांच्या आकाराएवढ्या २ गुहा आहेत. यातील दर्शनीची गुहा म्हणजे भैरोबाचं(शंकराचं)मंदिर आहे.मध्यभागी एक शंकराची पिंड ठेवली आहे, त्याभोवती बरेच त्रिशूल खोवून ठेवले आहेत.तिथेच २ पाण्याची छोटी तळी आहेत ज्यात पावसाचं पाणी साठतं. पाण्याच्या रंगावरूनचं कळलं की जेवण झाल्यावर भांडी इथेच धुतली जात असावीत.इच्छा नसूनही दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला तेच पाणी प्यावं लागलं.इथे वर्षातून एकदा किंवा दोनदा जत्रा भरते.त्यासाठी इथली स्थानिक माणसं जेवणाचं सामान घेऊन येतात, बकरी किंवा कोंबडीचा बळी देतात आणि स्वयंपाक करतात.त्यामुळे बरीच भांडी आणून ठेवलेली दिसतात.एकंदरीत वरची सगळी सोय पहाता तिथल्या लोकांसाठी ही गुहा चढणे म्हणजे एक किरकोळ डोंगर चढण्याइतकी शुल्लक बाब असावी असे वाटले.
दमल्यामुळे भूक नव्हती पण तरी आमच्यातील तिघेजण जेवण आणण्यासाठी परत खाली उतरले.त्यांच्या धाडसाचं खरंच कौतुक वाटलं मला कारण उतरायला परत १ तास आणि चढायला किमान २ तास लागणार होते.इथे एकदा चढेपर्यंतच माझी हालत खराब झाली होती.ते गेल्यावर मग आम्ही बाकीचे गप्पा मारत बसलो. थकव्यामुळे झोप कधी लागली कळलचं नाही. सकाळी आकाशातून एखादं विमान यावं आणि मला घेऊन जावं असंच राहून राहून वाटतं होतं.२ च्या सुमारास जाग आली तेव्हा जेवण घेऊन ते तिघे आले होते. फारशी भूक नसतानाही त्यांनी एवढ्या लांब जाऊन आणलय म्हणून मग सगळे जेवलो आणि मिळेल त्या जागेवर पसरलो.
सकाळी ६ ला जाग आली तेव्हा आपण कुठे आहोत ते कळलं. बाहेरच दृश्य बघून आलो ते बर झालं असं वाटलं.
खूप छान दिसत होता आसपासचा परिसर. कोवळं उन्हं पसरलं होतं सगळीकडे. पण मग माझ्या स्वभावानुसार लगेच आपण खूप उंचीवर आहोत हे लक्षात आलं आणि भीती वाटायला लागली. लवकर लवकर आवरून एक एक जण उतरायला लागला तशी माझ्या छातीतली धडधड वाढत होती
पण दोन काडीपैलवान मित्रांनी(धन्यवाद सनी आणि दिपक) मदत केल्यामुळे चढताना वाटली होती त्यापेक्षा कमी भीती मला उतरताना वाटली. त्यांच्याशिवाय खरोखर अशक्य होत उतरणं. हळूहळू एक-एक टप्पा उतरत उतरत डोंगरावर पोचलो. तर गावकरी आणि ७-८ वर्षांची मुलं गुहेकडे मोठमोठ्ठी लाकडं, जेवणाचं सामान, घेऊन निघालेली दिसली. त्या दिवशी जत्रा होती म्हणून ते सगळे गुहेकडे निघाले होते. इतकी उत्साही दिसत होती ती सगळी आणि पटापटा चढत होती की आम्हाला कौतुक वाटलं. अर्थात त्यांना काही हे फार अवघड नाही.
साधारण १० च्या सुमारास आम्ही गावात पोचलो. मग मस्त भरपूर वडापाव चेपून थोड फ्रेश होऊन पुण्याच्या दिशेने निघलो. लग्नानंतरचा माझा हा पहिलाच ट्रेक आणि तोही इतका अवघड. त्यामुळे मी खूप खूष होते. विश्वासच बसत नव्हता ४ वर्षांपासूनचा गाजलेला ढाकचा ट्रेक मी पूर्ण केला होता.
कलावंतांच्या मनातील मान्यवर
5 days ago
छान जमलंय वर्णन.. पण आणखी सविस्तर हवं होतं.
ReplyDeleteआणि फोटो असते तर वाचण्यातली गंमत वाढली असती :)
ये हुई ना बात!
ReplyDeletefarach khatarnak trek aahe! bhari ..
ReplyDeletekhup chan lihilayas. thode photo aani have hote .
ReplyDeleteThis is an amazing account really. I wish I visit this place soon. Thanks Madhura :) You are a true Team lead :)
ReplyDelete