Tuesday, November 23, 2010

तोरणा ! छत्रपती शिवाजीमहाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर केलेला पहिला गड.

तोरणा! छत्रपती शिवाजीमहाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर केलेला पहिला गड. स्वराज्याच्या तोरणातील पहिला मणी!स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्याने रोवली तो हा तोरणा. मला अजूनही तो धडा आठवतोय ज्यामध्ये महाराज आणि मॉंसाहेब हिंदवी स्वराज्याविषयी बोलत आहेत आणि त्यांना समोर दिसतो तो हा तोरणा!रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा किल्ला कसा सर करता येईल याचे मनसुबे रचले जात आहेत.

गेली चार वर्ष मी पुण्यात वास्तव्याला (जुन्या काळाविषयी बोलायला लागलं की असे शब्द आपोआप डोक्यात येतात ना ?:)) आहे,पण जायचा योगच येत नव्हता.कारण पाऊस असल्याशिवाय तोरण्याला जाण्यात मजा नाही हे आमच्या आधी जाऊन आलेल्या मित्रमंडळींनी मनावर पक्कं बिंबवलेलं.आणि राजगडासारखं तिकडे बघण्यासारखं फार काही नाही हे ऐकिवात होतं. यावर्षी जून महिन्यात मोसमी वाऱ्यांनी आपली हजेरी लावायला सुरुवात केली आणि आमचा निघायचा बेत पक्का झाला.सकाळी सात वाजता निघायचं ठरवूनही नऊ वाजता न्याहारी करून आमची गाडी तोरण्याकडे निघाली.साधारण १०.१५ च्या सुमारास

गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हा या गावी पोचलो.पुन्हा एकदा खाण्यापिण्याचा कार्यक्रम उरकून मंडळींनी चढायला सुरुवात केली.नुकताच पावसाळा सुरु झाला होता, त्यामुळे चहुकडे हिरवीगार शेतं, पेरणी करणारे शेतकरी, नांगराला जुंपलेले बैल असं चित्र पहायला मिळालं. धुंद करणारा मातीचा वास. अहाहा. पावसाळ्यतलं धरणीमातेचं रुप काही औरचं असतं. मात्र भरपूर पाऊस न पडल्यामुळे धबधबे काही दिसले नाहीत.चालायला सुरुवात केली तेव्हा गड फार काही मोठठा आणि उंच वाटत नव्हता, कारण ढगांनी त्याला कडं केलं होतं.वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पठारासारख्या दोन जागा आहेत.तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. त्याकाळी अशाच जागा शत्रुवर नजर ठेवायला कामी येत असणार.अजूनही ढगांची दाटी होती त्यामुळे शिखर दिसत नव्हते आणि अजून गड किती लांब आहे याचा अंदाजही येत नव्हता.दोन तास झाले तरी प्रवेशद्वार काही दिसेना,धीर थोडा सुटत चालला होता.प्रवेशद्वारापूर्वीचा शेवटचा टप्पा थोडा अवघड आहे.रेलींगला पकडून मोठमोठ्या उंचीच्या दगडांना पकडत चढावं लागतं.एवढ्या उंचीवर सामान न घेता चढायची मारामार असताना कोणी इथे येऊन रेलींग लावली त्यांचे मी मनोमन आभार मानले.या गडाचं नाव महाराजांनी प्रचंडगड का ठेवलं असेल याची प्रचिती त्यावेळी आली. तिथून झाडाझुडपातून जाण्याऱ्या वाटेत एकमेव सापडलेल्या धबधब्यात भिजण्याची मजा लुटली.

शेवटी १.३० च्या सुमारास महाद्वारापाशी पोचलो.सुट्टीचा दिवस असल्यामुळॆ बरीच गर्दी होती.महाद्वारापुढे थोडं चालल्यावर एक शेडवजा घर दिसलं.तिथे मस्त चहा-पोह्यावर ताव मारला आणि खालून बांधून आणलेलं जेवण तोरणाई देवीच्या मंदिर परिसरात फस्त केलं.पाऊस आणि ढगांमुळे लांबचं फार काही दिसत नव्हतं आणि आम्ही दमलोही होतो त्यामुळे गड फिरायचा विचार रद्द करुन उतरायला सुरुवात केली.

परत आल्यावर पायांची हालत खराब झाली होती.ेकदाचित सारखे ट्रेक करत राहिलं पाहिजे (म्हणजे त्यांना सवय होईल आणि ते दुखणार नाहीत)हेचं तर सुचवत नसतील ना ते ? ;)

ता.क.- हा ट्रेक पावसाळी वातावरण किंवा पाऊस असेल तर एका दिवसात करता येण्यासारखा आहे.वस्तीसाठीसुद्धा देवळात भरपूर जागा आहे.