Monday, February 15, 2021

एक होऊ घातलेला कुक :)

 बरेचदा आपण बोलण्यात ऐकतो - पुरुषांनी मनावर घेतलं तर ते बायकांपेक्षा उत्तम स्वयंपाक करतात. हॉटेलमध्ये पण बहुतांशी शेफ हे पुरुषचं असतात. अमेयला मनापासूनच जेवण बनवायला आवडत नाही. लग्न झाल्यावर मला वाटायचं दोघांनी मिळून जेवण बनवावं किंवा थोडं का होईना एकत्र काहीतरी करावं. पण तसं झालं नाही आणि मी माझ्या मनाची समजून घातली. आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिसावाला मला ऑफिसला जावं लागलं. घरी आल्यावर पहाते तर Surprise - त्याने पहिल्यांदाच गाजर हलवा केला होता. खूप छान वाटलं. 


त्यानंतर जेंव्हा मला दिवस गेले तेंव्हा मला वाटलं चला आता आपल्याला त्याच्या हातचं काहीतरी खायला मिळेल. पण त्याच्या सुदैवाने मला कसलाच त्रास झाला नाही त्यामुळे त्याने काही करायचा प्रश्नच आला नाही. पण त्या दरम्यान एक दिवस त्याने पिठलं केलं होत ते अफलातून झालं होत, अजूनही माझ्या जीभेवर ती चव रेंगाळते आहे. मला आजतागायत तसं पिठलं करायला जमलेलं नाही.

मध्यंतरी पोहे, उप्पीट, खिचडी, ऑम्लेट असं चुटुरफुटूर खायला मिळतं होत पण आज पहिल्यांदाच करून पण अंडा करी चविष्ट झाली होती. पोट आणि मन तृप्त झालं.  माझ्या आता लक्षात आलय कि हाताला चव असते म्हणतात ती हीच, कारण प्रत्येक पदार्थ पहिल्यांदा करून पण तो इतका छान होतो (किमान मला तरी तसा वाटतो). अमेय म्हणतो मला डे'ज सेलेब्रेट करायला आवडत नाहीत - 'मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा' ... पण आजच्या मुहूर्ताला धरून माझा तरी Valentine छान साजरा झाला. मला मिळालं गिफ्ट म्हणून एक उत्तम आयतं जेवण आणि एक होऊ घातलेला कुक :)

Thursday, April 23, 2015

बाली- मनमोहक नगरी

मित्र मैत्रिणींचे बालीचे फोटो पाहून मलाही कधी जाता येईल का असं कायम वाटत होत आणि अचानक तो योग जुळून आला. सहलीची  सगळी तयारी करायची जबाबदारी अर्थातच माझ्यावर होती. या कामी महाजालाची (internet) खूप मदत झाली. हॉटेल बुकिंग, प्रेक्षणीय स्थळांची माहिती, water sports activities इत्यादी वर भरपूर माहिती गोळा करून आम्ही ट्रिपसाठी सज्ज झालो. जवळपास ५ वर्षांनी आम्ही दोघंच फिरायला जाणार, त्यातही कुठल्याही टूरसोबत नाही म्हणून जास्तच excitement होती. बालीला भारतातून जायचं असेल तर मधल्या कुठल्याही देशात halt घ्यावा लागतो. माझा भाऊ सिंगापूरला असल्यामुळे आम्ही एक दिवस तिथे थांबून बालीला १ मार्चला दुपारी १२ ला पोचलो. 

इंडोनेशिया म्हणजे लांबच लांब पसरलेलं आणि जवळपास अठरा हजार छोट्यामोठ्या बेटांनी बनलेलं राष्ट्र. त्यातील जावा, सुमात्रा, कालिमांतान, सुलावेसी ही मोठी आणि महत्वाची बेटं आणि बाली, लोंबाक, कोमोदो, रिंका ही तुलेनेने लहान. पण या सर्वांमध्येही चिमुरड्या बालीचं महत्त्व जरा जास्तच. कारण तिथल्या सांस्कृतिक, कलात्मक आणि नैसर्गिक पार्श्वभूमीमुळे त्याला  आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचं स्थान प्राप्त झालेलं आहे.

मार्च महिना तसा उकाड्याचा असल्यामुळे एअरपोर्टवरून बाहेर येताच कोकणासारखी दमट हवा पाहून आम्ही जरासे हिरमुसलो, पण गाडीत बसून सुंदर देवळाच्या आकाराचं एअरपोर्ट पाहून आमची हि नाराजी लवकरच दूर झाली. बालीच्या लोकसंख्येपैकी ९०% हिंदू रहात असल्यामुळे संस्कृतीचा वारसा त्यांना जपता आलाय. रस्त्यावरचं traffic बऱ्यापैकी भारतातल्यासारखंच होतं फक्त खड्डे नव्हते. हॉटेलच location पाहून आम्ही फुल्ल फिदाच झालो कारण हॉटेलच्या समोरचं सुंदर कुटा बीच.  बाली मधली हि सगळ्यात happening जागा. 


संध्याकाळी गाडी ठरवून  आम्ही तानाह लॉटच्या दिशेने निघालो. वाटेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाताची हिरवीगार शेतं पाहून मन प्रसन्न झालं. पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेलं तानाह् लॉट हे मंदिरही इथल्या प्रसिध्द मंदिरांपैकी एक. मुख्य भूमीपासून समुद्राला जोडणाऱ्या एका खडकावर तानाह् लॉट बांधलेले आहे. पश्चिम किनाऱ्यावर असल्याने इथला सूर्यास्तही प्रसिध्द आहे. परंतु मंदिरात फक्त तिथल्या पुजार्यांनाच प्रवेश दिला जातो. 
भाताची हिरवीगार शेती 
तानाह लॉट मंदिर व सूर्यास्त पाहण्याची जागा 

मला नेहमी वाटत की चालत फिरल्यावर तिथल्या लोकांच जीवन जास्त जवळून न्याहाळता येतं. त्यामुळे परत आल्यावर आम्ही कुटा भागात भरपूर भटकलो. खरेदीसाठी, खाण्यासाठी आणि मसाजसाठी हा भाग विशेष प्रसिद्ध आहे. आम्हीही मग famous balinese massage चा अनुभव घेतला. इथल्या लोकांच खूप कौतक वाटलं मला, खूप प्रामाणिकपणे मन लावून काम करतात. कुठेही कामचुकारपणा नाही.  Customer is GOD ही उक्ती खरी ठरवून आपल्याला दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला मिळाल्याचा आनंद देतात.  रात्री कुटा बीचवर गार वाऱ्यात फेरफटका मारण्याची मजा काही औरच. 
दुसऱ्या दिवशी Nusa Dua बीच परिसरात Parasailing, Fish fly, Scuba diving अशा water activities करतानाचा अनुभव शब्दातीत. Seafood खाऊन मन एकदम तृप्त झालं. इथल्या seafood presentation ची पद्धत पण खूप आवडली. 

उलुवाटू मंदिर परिसरातून टिपलेले एक विहंगम दृश्य 
बालीच्या दक्षिण टोकावरील पेकाटू गावामध्ये समुद्रकिनाऱ्यापासून तीन-चारशे फूट उंच कड्यावर असलेलं उलुवाटू मंदिर हे इथलं आणखी एक आकर्षण. खोल खाली फेसाळणारा समुद्र, खडकांवर आदळणाऱ्या उंचच उंच लाटा आणि त्याच्यासमोरच मावळतीचा सूर्य असं सूर्यास्ताचं मोठं विहंगम दृश्य इथून दिसतं. पर्यटकांच्या दिमतीला इथे मोठी वानरसेना असतेच. मंदिराच्या परिसरात या वानरसेनेच्या तावडीतून गोष्टी सांभाळण्याची मोठी कसरत करावी लागते. रोज संध्याकाळी उलुवाटू मंदिरात रामायणावर आधारित प्रसिध्द केच्याक नृत्याचा कार्यक्रम असतो. केच्याक हा नृत्यप्रकार रामायणातील सीताहरण आणि लंकादहन या प्रसंगांवर आधारित आहे. केच्याकचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही वाद्याची किंवा संगीताची साथ न घेता फक्त तोंडाने फक्त च्याक् च्याक् केच्याक असा आवाज ५०-६० काढत ताल धरतात आणि त्यांच्या सोबतीने राम, लक्ष्मण, सीता, रावण, हनुमान अशी एकेक पात्रे येऊन रामायणातील ही कथा घडते. यामध्ये राम, रावण, सीता, जटायू यांची वेशभूषा, त्यांची देहबोली, हावभाव, हनुमानाचा प्रवेश, त्याच्या मर्कटलीला आणि अग्नीच्या साथीने रंगवलेला लंकादहनाचा हे प्रसंग खास. भारतीय असल्यामुळे या सगळ्या कथेची पार्श्वभूमी आपल्याला माहिती असते व हिंदू संस्कृतीचा अभिमान वाटतो. पण आपल्याकडे हे इतकं छान पद्धतीने का सादर केलं जात नाही याचं वाईटही वाटलं. बालीतील लोकांनी बरीच प्रसिद्धी करून इतिहास व पुराणकथांचं जतन केलं आहे याचं हे नृत्य हा उत्कृष्ठ नमुना. 

पुढच्या दिवशी सकाळी आम्ही लांबचा टप्पा गाठायचा म्हणून लवकर हॉटेलमधून बाहेर पडलो. आजचा आमचा Driver एकदम Young होता त्यामुळे त्याला चांगल इंग्रजी बोलता येत होतं.  त्याने आम्हाला बरीच माहिती सांगितली.  बालीमध्ये मुखत्वे ३ देवांना मानतात ब्रह्मा, विष्णु आणि महेश. बऱ्याच ठिकाणी गणपतीचीसुद्धा मूर्ती दिसते. रोज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी इथे पूजा केली जाते. पूजेचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे कानावर दोन फुले ठेवतात. चौकोनी आकाराच्या तळहाताएवढ्या केवड्याच्या पानांच्या द्रोणात काही फुले आणि त्यासोबत चॉकलेटस् किंवा फळ ठेवली जातात. हे द्रोण नंतर बालीमधील प्रत्येक घर, दुकान, हॉटेल, गाडी अशा ठिकठिकाणी ठेवलेले पाहायला मिळाले. रोज सकाळी या द्रोणांमधून देवाला नैवेद्य अर्पण करुन दिवसाची सुरुवात करण्याची इथे पध्दत आहे. एकंदरीत लोक फारच धार्मिक आणि आणि जुन्या परंपरा, चालीरीती जपणारे आहेत. खूप सुटसुटीत पद्धत ठेवली आहे पूजेची. त्यामुळे कुठल्याच मंदिराच्या बाहेर पूजेच्या सामानाच्या दुकानांची गर्दी दिसत नाही. 
मेंग्वेई मंदिर आवार 
देंपासारपासून उत्तरेकडे थोड्याच वेळात मेंगवी भागात असलेले तामान् आयून् हे मंदिर लागते. हे मंदिर तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. सुरुवातीला एक मोठे प्रवेशद्वार आणि पुढे छान हिरवळ पार केल्यावर मुख्य मंदिर लागते. इथल्या मंदिरांची प्रवेशद्वारे कमानीसारखी नसतात. दोन्ही बाजूंना दोन नक्षीदार शिल्प असलेल्या भिंती आणि त्यांच्या मध्ये असलेला आत जाण्यासाठीचा भाग एकदम सपाट. त्यावर काहीच नक्षीकाम नाही. असं वाटतं की कोणीतरी एक पूर्ण नक्षीदार भिंत बांधून मधला भाग कापून घेऊन गेलं असावं. मंदिराच्या तटबंदी असलेल्या मुख्य भागात पर्यटकांना प्रवेश नाही. पण कमरेपर्यंत असलेल्या तटबंदीतून आतील मंदिराचे अवशेष पाहता येतात. बालीमधल्या बहुतेक मंदिरांना लांबून आपल्याकडील दीपमाळेप्रमाणे दिसणारी गोपूरे दिसतात. आणि बहुतांश गोपूरांना आठ ते दहा उंच टप्पे असतात. पण जवळून पाहिल्यावर त्यावर चीनी पॅगोडाची छाप दिसते. या गोपूरांना आणि एकूणच मंदिरांच्या निमुळत्या छपरांना नारळाच्या पानांचे जाड आवरण असते आणि त्यापासून येणारा काळपट रंग या मंदिरांना एक वेगळीच शोभा देऊन जातो.

देंपासार हे राजधानीचे मुख्य शहर पार केले की निसर्गसौंदर्याने नटलेल्या खऱ्या बालीचे दर्शन घडायला सुरुवात होते. रस्त्याच्या दुतर्फा रचनात्मक घरं, अधे मध्ये भाताची शेतं, उंच नारळाची झाडं, दर ३-४ घरानंतर असणारी दगडी देऊळ असं खेड्यांच दिसणारं दृश्य मन मोहून टाकत होत. प्रत्येक घराभोवती काळ्या दगडांची तटबंदी असते आणि घराबाहेर त्याच धर्तीचे एक छोटेसे दगडी देऊळ पाहायला मिळते. इथले लोक त्याला फॅमिली टेम्पल म्हणतात. काही ठिकाणी हे देऊळ इतके मोठे असते की घर कोणते आणि देऊळ कोणते हेच कळत नाही. तसे पाहिले तर बालीमध्ये मंदिरांची काही कमी नाही. आणि इथली मंदिरे हे बालीचे सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे. 

बेडूगुल तलाव 
उत्तर टोकाला असलेले बेडूगुल तळे आणि तळ्याकाठी असलेले उलून दानू मंदिर, बालीमध्ये मला आवडलेली अजून एक जागा. एखाद्या हिलस्टेशन सारखी मस्त थंडगार हवा पडली होती.  चहू बाजूंनी डोंगर आणि तळ्यात मंदिर, फार विहंगम दृश्य होतं.  Speed boat ने तळ्याला चक्कर मारून छान वेळ घालवून आम्ही निघालो.  वाटेत उबुदजवळ River Rafting चे  board पाहून ते करण्याचा plan बनवला. दोन्ही बाजूला गर्द झाडी, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज, डोंगरामध्ये अधून मधून वाहणारे पाणी हे सगळे पाहून डोळ्याचं पारण फिटलं. फार सुंदर अनुभव होता.  Rafting संपवून हॉटेलवर परतलो. 


तीर्थ गंगा 
पुढच्या दिवशी तीर्थ गंगा नावाच्या एका सुंदर तळ्याच्या ठिकाणी पोचलो.  इथे डोंगरातून येणार पाणी खूप शुध्द असल्यामुळे पवित्रही मानलं जातं. तळ्यात दगडांच्या खांबांचा वापर करून पायवाट तयार केली आहे. तिथून पुढे वाटेत महोगनी हॉटेलला मस्त Rice fileds च्या सान्निध्यात थंडगार हवेमध्ये भरपेट जेवलो. सध्या बालीमध्ये पावसाळी महिना असल्यामुळे अधे मध्ये पावसाच्या सरी आणि गार गार हवा यामुळे दिल एकदम खूश होगया. बैसाख हे बालीतील सगळ्यात मोठ्ठ मंदिर आहे, पण पावसामुळे पहाता आलं नाही आणि तिथल्या नियमानुसार गाईडशिवाय आत जाता येणार नाही या तिथल्या लोकांच्या फाजील हट्टामुळे आम्ही तो नादच सोडला. फक्त या एकाच देवळाच्या बाहेर आम्हाला दुकानांची गर्दी दिसली आपल्याकडे असते तशी. फसवेगिरीचा अनुभव बालीमध्ये या एकाच ठिकाणी आला. नाहीतर बाकी सगळे गुण घेण्यासारखे आहेत. गोड गोड बोलणं,  त्यांची प्रेमाने विचारपूस करण्याची पद्धत, नम्रतेने वागण्याची कला यामुळे टुरिस्टना अगदी भारावून गेल्यासारखं होतं आणि पुन्हा पुन्हा बालीला यायची इच्छा निर्माण होते. 

आमची बालीतली शेवटची संध्याकाळ पुन्हा एकदा कुटा बीचवर घालवायला आम्हाला खूपच आनंद झाला. थोडा पाऊस आणि थोडी उघडीप अशा मस्त धुंद वातावरणात मनसोक्त भटकलो. एका कॅफेमध्ये Delicious Seafood Dinner चा आस्वाद घेऊन झोपलो.  ५-६ दिवसात एकदम ताजतवान करणाऱ्या बालीला परत येण्याचं आश्वासन देऊन अतिशय उत्साहवर्धक, निसर्गरम्य अशा बालीचा आम्ही निरोप घेतला. प्रत्येकाने एकदा तरी नक्कीच भेट द्यावी अशी हि मनमोहक नगरी. 

Friday, July 26, 2013

लोहगड

हो नाही हो नाही करता करता जवळपास वर्षाने  मी पुन्हा ट्रेकसाठी आमच्या ग्रुपसोबत बाहेर पडले. यावेळचा गड होता लोहगड. तसा  फार मोठा नाही चढायला. आम्ही सहा जण तीन दुचाकींवर स्वार झालो आणि दहा च्या दरम्यान पुणे सोडलं. खर तर साधारण ५ वर्षांपूर्वी मी हा ट्रेक एकदा केला आहे पण तरीही पावसाळा सुरु झाल्याने अमेय सोबत जायचं म्हणून मी नव्या उमेदीने निघाले. पुण्याहून साधारण ४० कि. मी. अंतरावर असणाऱ्या मळवली गावात गाड्या लावून आम्ही चालायला सुरुवात केली. गेल्या १०-१५ दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे सगळीकडे हिरवंगार दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. नवीनच तयार  झालेल्या धबधब्याजवळ बरीच गर्दी दिसत होती. खूप मोह झाला तरी आम्ही तिथे भिजण टाळून चालायला सुरुवात  केली. ट्रेकला एवढी गर्दी मी पहिल्यांदाच पाहत होते. एरवी सिंहगडला खूप गर्दी पहिली आहे पण आजचा अनुभव निराळा होता. एकीकडे आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. विशेषतः युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.



बऱ्याच दिवसांनी एवढ चालत असल्यामुळे सुरुवातीला धाप लागत होती पण धुक्यात लपलेला लोहगड खुणावत होता. त्यामुळे अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद घेत रमत गमत एका तासाने आम्ही पायथ्याशी पोचलो. आणि मग या एवढ्या गर्दीच कारण मला कळल. लोणावळ्यापासून लोहगड पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता केला आहे त्यामुळे गाडीने येण लोकांना सोप्प झालं आहे. 

या  पायथ्यापासून गडापर्यंत पायऱ्या आहेत. खर तर चढाचा रस्ता असेल तरी काही वाटत नाही पण पायऱ्या आल्या की आम्हाला कंटाळा येतो :) पण यावेळी वरून वाहत येणाऱ्या पाण्यामुळे जरा मज्जा आली.

महादरवाजा आणि प्रवेशद्वार यापाशी बुरुजांचे बांधकाम अजूनही टिकून आहे. पावसामुळे गड फारसा फिरून पाहता आला नाही. गडावर सध्या बांधलेलं एक देऊळ आणि दोन तळी आहेत. फिरत फिरत एका कडेला सुसाट्याचा वारा वाहत असताना बराच वेळ उभं राहून आम्ही आमची फोटोग्राफीची हौस भागवून घेतली. थोडा वेळ थांबून मग आम्ही उतरायला सुरुवात केली. पायऱ्या उतरताना पाय भरून आले पण थंड वातावरणामुळे थकवा जाणवला नाही. 

पायथ्यापाशी आल्यावर मग पोटोबासाठी गरम गरम कणीस आणि कांदा भजीवर ताव मारला आणि पुढे निघालो. वाटेत विसापूरचा किल्ला खुणावत होता पण वेळेअभावी त्याला पुन्हा कधीतरी भेट द्यायच्या आश्वासनासह आम्ही परतलो.

Tuesday, October 16, 2012

एकुलती एक कविता ...

बऱ्याच दिवसांपूर्वी आमच्या मित्रमंडळींमध्ये कवितेविषयी चर्चा सुरु होती  मग मलाही अशीच एक सुचलेली साधी कविता --

कविता हि सुचावीच लागते,
गोष्ट जशी घडावीच लागते .....

मला कधी जमेल का कविता करायला,
इतरांचं बघून न जळता वाचायला .....

या कवितेच्या मागे धावता धावता माझी दमछाक होते,
हि मात्र दूर बसून माझी फजिती पहात बसते .....

कितीही आणि कसंही केलं तरी मला काही हि बधत नाही,
आणि त्यामुळे मला तिची जवळीक काही साधत नाही .....

शेवटी मी ठरवलं आहे सुचेल तेंव्हा सुचेल,
पण जेंव्हा सुचेल तेंव्हा ते असं भलतंच काहितरी असेल .....

Monday, October 15, 2012

लहानपण देगा देवा...

आज कालच्या धावपळीच्या जगात स्व:ताला द्यायला आपल्याकडे फार कमी वेळ  असतो. मग एखाद्या वेळी कुठल्या लहान मुलाला खेळताना किंवा रडताना पाहिलं कि मला माझ्या लहानपणीची आठवण हमखास येते. किती सुंदर होते ते दिवस...ना तेंव्हा पैशाच्या मागे धावायला लागायचं ना वेळेच्या.... मस्त आरामात, स्वछंदी  जगता येत होत...मनाला वाटेल तसं पाहिजे तिथे हिंडता बागडता  येत  होत .हां  आता  तेंव्हा  आपल्याला  पाहिजे  ती  वस्तू  त्याची  किंमत  मोजून  खरेदी  करता  येत  नव्हती पण  बाबांकडून  परवानगी  मागून  खर्च  करण्यातसुद्धा  एक वेगळीच मजा असायची आणि मिळालेल्या प्रत्येक गोष्टीची त्यामुळे किंमत असायची....

स्वत:  कमवायला लागल्यापासून असं काही राहिलाच नाही, सगळ तर पाहिजे तेंव्हा विकत  घेता  येत आता   कधीही ... पण फक्त वाढदिवसाला आणि दिवाळीला असे वर्षातून दोन वेळलाच मिळणाऱ्या कपड्यांमधला आनंद आता  महिन्याला चार चार कपडे घेतले तरी का येत नाही ? किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद लुटता येत होता तेंव्हा... पार्टी  करायला एक १  रुपयासुद्धा पुरेसा  असायचा. आठ आण्याची  भेल , चार आण्याचा  गोळा  आणि चार आण्याची चिक्की...

पाहुणे  आले  घरी  कि  त्यांनी  दिलेल्या  पैशांनी खारुताईमध्ये (आजकालची  piggy bank) ते पैसे टाकायचे  आणि मग असेच भरपूर पैसे साठले कि ते परत परत मोजून त्यातून काय घेता येईल याचा विचार करत  बसायचं . आता हातात मिळणारे पैसे वाढले असले तरी त्यातून खरेदी करता येणारा आनंद त्या तुलनेत   कमी झाला आहे.

माझं आजोळ कर्नाटकात निपाणी या गावचं. तिथे आमच्या पणजोबांच्या काळातला मोठा वाडा आहे १७  खोल्यांचा दुमजली. आमच्याकडे  ४  खोल्या  आणि  बाकी  मग भाडेकरूना राहायला दिलेल्या. त्या  वाडयाला  ५  न्हाणीघर आहेत. लपाछपी खेळताना अशा जागा खास उपयोगी पडायच्या. वर्षातून किमान २ वेळा तरी आम्ही आजोळी जायचो. वाड्याच्या बाहेर रिक्षा थांबली कि पळत पळत जाऊन वाड्याचे दार उघडले  कि  आज्जी  आजोबांच्या  चेहऱ्यावर  ओसंडून  वाहणारा  आनंद अजूनही तसाच आठवतो आहे मला.  त्यांना  नमस्कार करून मग घरभर भटकून मागच्या वेळी काय नव्हत किंवा आता नवीन काही दिसतंय का  ते  पहायचो. मग  आजोबाना  (आम्ही  त्यांना  आबा  म्हणतो ) झोपाळा जोडायच्या  कामावर  नेमून  आज्जी  काय  खायला  देते  त्यावर  नजर. एकदा  का  झोपाळा  लागला  कि  त्यावर  बसून  मोठमोठ्याने  झोके घेणे, आत स्वयंपाकघरात खाण्यापिण्याच्या ऑर्डरी सोडणे आणि  मग  गप्पा  कुटणे ... यातली  मजा  काही  औरच  होती. त्यावेळी वाड्यात बरीच मुलमुली आमच्या वयाच्या असल्यामुळे  त्यांच्यासोबत आम्ही सगळी मावस भावंड मिळून खूप दंगा करायचो.  काचाकवड्या, पत्ते, शिवाजी म्हणतो पळा पळा, टिपीटिपी टिपटॉप, लगोरी,  लंगडी पळती असे काय काय खेळ खेळायचो. पत्त्यामाधला  not at home हा  डाव  खेळताना तर आपले पत्ते दिसू नयेत म्हणून कुठे कुठे  पळायचो. मला  वाचनाची  आवड  माझ्या  आई आणि आज्जी आजोबांमुळे  लागली. आजोबा शिक्षक असल्यामुळे आणि मुळातच त्यांना वाचनाची आवड असल्यामुळे आजोळी खूप पुस्तक जपून ठेवली  आहेत. लहानपणी मी पंचतंत्राच्या गोष्टी अगदी पुरवून पुरवून वाचायचे. कारण एकाच दिवशी भरपूर गोष्टी वाचल्या तर सुट्टी संपायच्या आतच सगळ पुस्तक संपेल आणि मग परत कुठल लहान मुलांच पुस्तक लवकर सापडणार नाही, कारण लहान मुलांची वाचायची पुस्तक फार कमी होती.

आम्ही सगळे सकाळी लवकर उठायचो, मग वाड्यातच असलेल्या विहिरीवरून पाणी काढण्यासाठी आमची चढाओढ असायची. ते झालं कि चुलीवर पाणी तपावायालो बसायचो. आबा आम्हाला जुन्या पेपरची रद्दी किंवा जुनी पत्र द्यायचे. मी तर प्रत्येक पत्र वाचून मगच ते जाळायचे. फार गमतीदार पत्र असायची ती. आत्ताच्या e-mail च्या जमान्यात हे सगळ खूप दुर्मिळ झालंय.

बैठकीच्या खोलीत एक  ठोक्याचं घड्याळ आहे, दर  तासाला त्याचे टोले पडायचे. ठोके पडायला  लागले  कि  जिथे  असेल  तिथून  पळून  येऊन मी  ते मोजायचे. आमच्या आज्जी आबांना पण पत्ते खेळायला आवडतं मग रात्री आम्ही सगळे  मिळून गड्डा झब्बू, बदाम सात , ३०४ , लॅडिज , चॅलेंज असे  पत्त्यातले बरेच प्रकार  खेळायचो. आमच्या आबांना chitting केलेली किंवा खाणाखुणा केलेल्या अजिबात चालत नसत त्यामुळे  आम्हालाहि तशीच सवय लागली. पुढे  कॉलेजमध्ये आल्यावर त्यामुळे माझी जाम पंचाईत व्हायची.

रात्री मग आई आणि आज्जीला चिकटून कोण झोपणार म्हणून वाद. शेवटी आज आपला नंबर लागल्यावर होणारा  आनंद ... आज्जी, आई, मावशी यांच्या  गप्पा मच्छरदाणीतून पडल्या पडल्या ऐकायला फार मजा  वाटायची. आमच्या कोल्हापूरकडे  सगळे  लोक गप्पिष्ट. मग आम्ही  मुलं  त्यांना  चिडवायचो - झाली  का  तुमची  कॅसेट  सुरु ? नंतर नंतर मग जशा CD, DVD  बाजारात आल्या तसं म्हणायला लागलो कि काय  सुरु  झाली  का DVD ? :)

जसं जसं लिहिते आहे तसं तसं इतकं काय काय आठवायला लागलं आहे.. वाटतं सगळ लिहून टाकावं. ते   दिवस  परत  यायचे  नाहीत  आता  म्हणून  खूप  वाईट  वाटत. आपल्या डोळ्यावर एक video रेकॉर्ड करता येईल अशी सोय पाहिजे होती. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते सगळ रेकॉर्ड करून परत परत पाहता आलं असतं. आता आपल्यातलाच बराचसा निरागसपणा आणि छोट्या छोट्या गोष्टीत मिळणारा आनंद हरवून  बसलोय आपण. तरी सुरुवातीपासूनच खूप साध्या वातावरणात रहायची सवय असल्यामुळे अजून आम्ही मुळांशी जोडलेलो आहोत. कसल्याही सुविधा नसल्या तरी आम्हाला कुठेही राहायला आवडत. माझ्या  नशिबाने मला भरपूर मजा करायला मिळाली माझ्या आजोळी. हल्ली कॉम्पुटर, मोबाईलवर खेळणारी मुलं   पाहिली कि मला त्यांची दया येते,  ह्या असल्या इलेक्ट्रॉनिक गोष्टींनी अगदि जखडून टाकलंय त्यांना. त्यामुळे एकत्र राहण्यातली मजा किंवा काही वाटून मिळतो तो आनंद, भावंडांतलं प्रेम त्यांना  कळतच नाही.

आमच्या  लहानपणी  आम्ही  दिवाळी  आणि  मे  महिन्याच्या  सुट्टी  ची  अगदी  चातकाप्रमाणे  वात  पाहायचो. कधी एकदा सुट्टी लागते आणि सगळे बहिणभाऊ एकत्र जमून घर हादरून टाकतो अस व्हायचं.
आता वाटत लहान होतो तेच बर होत. तुकारामानी  म्हटलंयच  नाहीतरी लहानपण  देगा  देवा, मुंगी साखरेचा  रवा ..........

Tuesday, December 7, 2010

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई

या पावसाळ्यात फारसे ट्रेक करायला मिळाले नाहीत.मधल्या थोडया काळात पाऊसच पडला नाही,आणि आता थंडीची सुरुवात हवी असताना धो धो कोसळतो आहे. या संधीचा फायदा घ्यायच ठरवून आम्ही ५ जण (मी,अमेय,मानसी,स्वप्नील आणि प्रविण)पुण्याहून कारने निघालो.खरं तर यावेळी मला ट्रिप करायची होती आणि बाकीच्यांना ट्रेक. मग एक दिवस ट्रेक आणि एक दिवस ट्रिप असा प्रोग्राम ठरला आणि गाडी इगतपुरीच्या दिशेने निघाली.आमचा एक मित्र प्रसाद तिथे महिंद्रामधे काम करतो , त्याने आमची रहायची उत्तम सोय गेस्टहाऊसमधे केली होती. पहाटे ५ ला आम्ही गेस्टहाऊसवर पोचलो.रात्रीच्या प्रवासामुळे खरं तर झोप येत होती पण आमच्यातील अतीउत्साही आणि कधीही न कंटाळणार्‍या स्वप्नीलच्या आग्रहामुळे तासभर विश्रांती घेऊन पुन्हा गाडी काढून प्रसादला घेऊन आम्ही ६ जण कळसुबाईच्या पायथ्याशी असणार्‍या बारी या गावाकडे निघालो.



इगतपुरीहून साधारण ३० कि.मी.अंतरावर हे गाव आहे.सभोवती असणार्‍या बर्‍याच डोंगररांगा सकाळच्या वेळी उल्हसित करत होत्या.गावातच नाश्ता करुन ८ च्या सुमारास आम्ही चढायला सुरुवात केली.अर्ध्या-पाऊण तासातच दम लागला.बर्‍याच दिवसात ट्रेक न केल्यामुळे चालायची सवय मोडली होती.पावसाळी व ढगाळ वातावरणामुळे त्यातल्या त्यात कमी दम लागत होता ही जमेची बाजू.मग तिथे जवळच असलेल्या एका शेड मधे लिंबुसरबत पिल्यावर जरा तरतरी आली आणि दम लागलेल्या वेळी सरबतासारखं काही मिळणं म्हणजे संजीवनीच.एकंदरीत या भागात गरिबी फार आहे.शेतीवर कसंबसं भागतं.त्यामुळे शनिवार-रविवार ट्रेकला येणार्‍या लोकांमुळे त्यांना थोडी आर्थिक मदत होते.

सरबत पिऊन नव्या जोमाने चढायला सुरुवात केली. मधल्या एका टप्प्यावर आल्यावर शिखरावर पोहोचण्यासाठी लोखंडी शिड्यांची सोय असलेली दिसली .या एवढ्या शिड्या पार केलं की झालं, आता इथून फार काही वेळ लागणार नाही ,कशाला लोकांनी इतका बागुलबुवा केला आहे अस मनात म्हणत असतानाच एक माणूस भेटला आणि म्हणाला कि "तुम्ही अजून २५ टक्केहि अंतर चढला नाही आहात." हे ऐकल्यावर जरा धीर खचला पण ९ च वाजल्यामुळे हळूहळू गेलो तरी चालेल असं मनाला समजावत पुन्हा चालू लागलो.



एक एक शिडी चढत,मधेच असणार्‍या थोड्या पायर्‍या चढत एका डोंगरावर पोचलो.हेच कळसुबाई असं सुरुवातीला वाटलं होत पण तो आमचा भ्रम होता.आदल्या दिवशी वर रहायला गेलेला एक आजोबांचा घोळका वाटेत भेटला."अजून निम्मं अंतर राहिलय"असं ते म्हणाले म्हणून थोडा वेळ तिथे विश्रांतीसाठी थांबलो.वाटेत थोडया थोडया अंतरावर ऊन आल्यामुळे वेग मंदावत होता.पण तरीही चालणं थांबवत न्हवतो.एका नंतर एक असे २-३ छोटे छोटे डोंगर चढल्यावर एकदाचं खरं खरं कळसुबाईचं शिखर धुक्यात लपेटलेलं दिसलं.अजून इतकं चालायचं म्हटल्यावर राहू दे इथेच थांबू असा क्षणभर मनात विचार आला "पण एवढ्या वर येऊन थोडक्यासाठी माघार घेणं या सह्याद्रीच्या लेकरांना शोभेल का ?  हळूहळू चालू फार फार तर एका ऐवजी दोन तास लागतील इतकंच."असं ठरवून पुन्हा चालायला सुरुवात केली.


या ठिकाणाहून मागे वळून पाहिलं आणि आपण किती उंचावर आलोय याचा अंदाज आला.पायथ्यापासून उंच वाटणारे डोंगर आता आमच्यापेक्षा बरेच खाली असल्याचं जाणवलं.सभोवतीचा परिसरही छान दिसत होता.शेवटची शिडी पार करुन वर पोचलो आणि जग जिंकल्याचा आनंद झाला.

खालच्या गावातून आमच्यासोबत चार कुत्री आली होती अगदी वरपर्यंत.खुप आश्चर्य वाटलं आणि कौतुकही.त्यांनी तर चढताना आम्हाला एकदा रस्ता चुकण्यापासून वाचवलंही होतं.काहीतरी खायला मिळेल या आशेने कदाचित ती आली असतील पण आम्ही त्यांना निराश केलं कारण दिवाळीच्या फराळातलं फारसं काही त्यांना खाण्यासारखं नव्हतं.खाली येईपर्यंत त्यांनी आम्हाला सोबत केली.आत्तापर्यंत प्रत्येक ट्रेकला आम्हाला यांच्या बांधवांनी सोबत केली आहे.दत्तमहाराजांची कृपा .


तिथे वर छोटसं कळसुबाई देवीचं मंदिर आहे. जवळच असलेल्या कठड्यावर बसून दिवाळीच्या वेळी घरून आणलेला चिवडा,चकली आणि लाडूचा फडशा पाडला आणि तिथेच मस्त ताणून दिली. स्वप्नील एकदम टोकाला झोपला होता. तो झोपेत जरा इकडे तिकडे हलला असता तर खाली थेट दरीच. पण असं काही झाल नाही  दमल्यामुळे अंगावर ऊन येऊनही डुलकी लागली. एक छोटीशी डुलकी काढून पुन्हा ताजेतवाने झालो. या ठिकाणाहून आजूबाजूचा बरार परिसर न्हाहाळाता येतो. भंडारदरा धरणाचे back water ही दूरवर पसरलेले दिसते. नेहमीप्रमाणे भरपूर फोटो काढून आम्ही परतायच्या वाटेला लागलो.


शिड्या उतरताना खालची दरी पाहून आधीच भरुन आलेले पाय थोडेसे थरथरायला लागले होते पण हळूह्ळू बसत बसत, कुठेही धडपडणार नाही अशा रितीने उतरु लागलो. मधे परत एका ठिकाणी सरबत पिल्यावर तरतरी आली. इतक्यात ढगांचा गडगडाट ऐकू आला आणि मग मात्र मी पायांची गती वाढवली. कारण एकदा जर पावसात अडकलो तर उतरणं फार अवघड झालं असतं. कारण उतरतानाची वाट मातीतूनचं जात होती आणि पाऊस पडल्यावर तिथे चिख्खल पसरला असता.अडीच तासात खाली बारी गावात पोचलो आणि निवांत बसलो. आधीच दोघातिघांनी जाऊन जेवणाची ऑर्डर दिली होती.

सकाळी न झोपताच निघायचा स्वप्नीलचा निर्णय बरोबर ठरला होता.त्यामुळेच पावसाच्या तडाख्यातून वाचलो होतो म्हणून त्याची भरपूर स्तुतीही केली. पूर्ण उन्हात हा ट्रेक करणं जरा अवघड आहे, कारण नुसताच चढ आहे. उतार-चढ असं काही नाही शिवाय जसंजसं वर जाऊ तशा सावलीच्या जागा कमी आहेत.

गावातील एका घरात पिठलं भाकरी भात(ट्रेकच्या वेळी उपलब्ध असणारा एकमेव मेनू) आणि भाजी(खूपच तिखट असूनही कडकडून भूक लागल्यामुळे पाणी पीत पीत खाल्ली) अशा घरगुती जेवणावर ताव मारला. पुन्हा एकदा इगत्पुरीला जाताना वळून कळसुबाईकडे कटाक्ष टाकल्यावर मन सूखावून गेलं. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (उंची १६४६ मी.) सर केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता.

Photo link
http://picasaweb.google.com/117906750302735376522/Kalsubai?authkey=Gv1sRgCLnc5oPFuYXV6AE&feat=email#

Tuesday, November 23, 2010

तोरणा ! छत्रपती शिवाजीमहाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर केलेला पहिला गड.

तोरणा! छत्रपती शिवाजीमहाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सर केलेला पहिला गड. स्वराज्याच्या तोरणातील पहिला मणी!स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्याने रोवली तो हा तोरणा. मला अजूनही तो धडा आठवतोय ज्यामध्ये महाराज आणि मॉंसाहेब हिंदवी स्वराज्याविषयी बोलत आहेत आणि त्यांना समोर दिसतो तो हा तोरणा!रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हा किल्ला कसा सर करता येईल याचे मनसुबे रचले जात आहेत.

गेली चार वर्ष मी पुण्यात वास्तव्याला (जुन्या काळाविषयी बोलायला लागलं की असे शब्द आपोआप डोक्यात येतात ना ?:)) आहे,पण जायचा योगच येत नव्हता.कारण पाऊस असल्याशिवाय तोरण्याला जाण्यात मजा नाही हे आमच्या आधी जाऊन आलेल्या मित्रमंडळींनी मनावर पक्कं बिंबवलेलं.आणि राजगडासारखं तिकडे बघण्यासारखं फार काही नाही हे ऐकिवात होतं. यावर्षी जून महिन्यात मोसमी वाऱ्यांनी आपली हजेरी लावायला सुरुवात केली आणि आमचा निघायचा बेत पक्का झाला.सकाळी सात वाजता निघायचं ठरवूनही नऊ वाजता न्याहारी करून आमची गाडी तोरण्याकडे निघाली.साधारण १०.१५ च्या सुमारास

गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हा या गावी पोचलो.पुन्हा एकदा खाण्यापिण्याचा कार्यक्रम उरकून मंडळींनी चढायला सुरुवात केली.नुकताच पावसाळा सुरु झाला होता, त्यामुळे चहुकडे हिरवीगार शेतं, पेरणी करणारे शेतकरी, नांगराला जुंपलेले बैल असं चित्र पहायला मिळालं. धुंद करणारा मातीचा वास. अहाहा. पावसाळ्यतलं धरणीमातेचं रुप काही औरचं असतं. मात्र भरपूर पाऊस न पडल्यामुळे धबधबे काही दिसले नाहीत.चालायला सुरुवात केली तेव्हा गड फार काही मोठठा आणि उंच वाटत नव्हता, कारण ढगांनी त्याला कडं केलं होतं.वाटेत थोड्या थोड्या अंतरावर पठारासारख्या दोन जागा आहेत.तिथून आजूबाजूचा परिसर न्याहाळता येतो. त्याकाळी अशाच जागा शत्रुवर नजर ठेवायला कामी येत असणार.अजूनही ढगांची दाटी होती त्यामुळे शिखर दिसत नव्हते आणि अजून गड किती लांब आहे याचा अंदाजही येत नव्हता.दोन तास झाले तरी प्रवेशद्वार काही दिसेना,धीर थोडा सुटत चालला होता.प्रवेशद्वारापूर्वीचा शेवटचा टप्पा थोडा अवघड आहे.रेलींगला पकडून मोठमोठ्या उंचीच्या दगडांना पकडत चढावं लागतं.एवढ्या उंचीवर सामान न घेता चढायची मारामार असताना कोणी इथे येऊन रेलींग लावली त्यांचे मी मनोमन आभार मानले.या गडाचं नाव महाराजांनी प्रचंडगड का ठेवलं असेल याची प्रचिती त्यावेळी आली. तिथून झाडाझुडपातून जाण्याऱ्या वाटेत एकमेव सापडलेल्या धबधब्यात भिजण्याची मजा लुटली.

शेवटी १.३० च्या सुमारास महाद्वारापाशी पोचलो.सुट्टीचा दिवस असल्यामुळॆ बरीच गर्दी होती.महाद्वारापुढे थोडं चालल्यावर एक शेडवजा घर दिसलं.तिथे मस्त चहा-पोह्यावर ताव मारला आणि खालून बांधून आणलेलं जेवण तोरणाई देवीच्या मंदिर परिसरात फस्त केलं.पाऊस आणि ढगांमुळे लांबचं फार काही दिसत नव्हतं आणि आम्ही दमलोही होतो त्यामुळे गड फिरायचा विचार रद्द करुन उतरायला सुरुवात केली.

परत आल्यावर पायांची हालत खराब झाली होती.ेकदाचित सारखे ट्रेक करत राहिलं पाहिजे (म्हणजे त्यांना सवय होईल आणि ते दुखणार नाहीत)हेचं तर सुचवत नसतील ना ते ? ;)

ता.क.- हा ट्रेक पावसाळी वातावरण किंवा पाऊस असेल तर एका दिवसात करता येण्यासारखा आहे.वस्तीसाठीसुद्धा देवळात भरपूर जागा आहे.

Tuesday, April 27, 2010

ढाकचा ट्रेक - एक अविस्मरणीय अनुभव

चार वर्षांपूर्वी आम्ही कॉलेजमध्ये असताना ढाकचा ट्रेक केला होता , पण तेव्हा वर गुहेपर्यंत काही जायचं धाडस झालं नव्हतं. पुन्हा एकदा यावेळी ढाक ला जायचं ठरलं आणि आनंद, भीती दोन्ही मनात दाटल्या. एका गाडीवरून दोघे असे दहाजण लोणावळ्याच्या दिशेने निघालो. मस्त रिकामा रस्ता पाहून अर्धा तास एका गाडीचा ताबा मी घेतला. साधारण संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही जांभिवली या गावात पोचलो. पुण्यापासून साधारण ५०-६० कि.मी. वर आहे हे गाव. याच गावापासून चालायला सुरुवात करायची होती. सूर्य मावळायच्या आत गुहेत पोचणं गरजेचं होतं म्हणून आम्ही गाड्या तिथल्याच एक घरी लावून पिठलं-भाकरीची सोय करून निघालो. आमच्यातील २-३ जण परत येऊन ही पिठलं-भाकरी नेणार होते. उन्हं कमी असल्यामुळे उकाडा तसा जाणवत नव्हता , पण बऱ्याच दिवसात ट्रेक केला नसल्यामुळे दम बराच लागत होता आणि त्यामुळे चालायचा वेगही मंदावत होता.

चालढकल करत ७ च्या सुमारास आम्ही गुहेच्या पायथ्याशी पोचलो. खरी कसोटी तर आता इथून पुढे होती. डोंगरावर असलेल्या दगडांच्या खाचात जागा सापडेल तिथे हाताने पकडत पकडत एक एक पाय पुढे न्यायचा आणि असं थोडं पोटावर झुकून तिरकं चालायचं. अंधार पडल्यामुळे खाली किती खोल दरी आहे ते दुसऱ्या दिवशी सकाळीच कळले. :) पण त्यामुळे वाटली असती त्यापेक्षा कमी भीती वाटली. नाहीतर भीतीने गर्भगळीत होऊन मी तिथेच ठाण मांडून बसले असते. तिथून थोड पुढे गेलं की दगडालाच आकार देऊन पायऱ्या केल्या आहेत. आणि मधे मधे आधारासाठी लोखंडी सळ्या लावल्या आहेत.

यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे दोरीच्या सहाय्याने दोन बांबू ठेवले आहेत त्यावरच्या खाचांवर पाय ठेवत वर चढायचं. कमी उंची आणि वजनामुळे मला हा पल्ला फारच त्रासदायक ठरला कारण या लाकडावरच्या खाचा बऱ्याच अंतरावर होत्या. पण आमच्या वानर वंशाच्या मित्रांनी मदत केली आणि एकदाची मी गुहेत पोचले. मनात खूप आनंद आणि त्याच वेळी भीती अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. इतक्या अवघड जागी आलेल्याचा आनंद आणि आता उद्या पुन्हा त्याच वाटेवरून उतरायच कसं याची भीती.

वर २-३ खोल्यांच्या आकाराएवढ्या २ गुहा आहेत. यातील दर्शनीची गुहा म्हणजे भैरोबाचं(शंकराचं)मंदिर आहे.मध्यभागी एक शंकराची पिंड ठेवली आहे, त्याभोवती बरेच त्रिशूल खोवून ठेवले आहेत.तिथेच २ पाण्याची छोटी तळी आहेत ज्यात पावसाचं पाणी साठतं. पाण्याच्या रंगावरूनचं कळलं की जेवण झाल्यावर भांडी इथेच धुतली जात असावीत.इच्छा नसूनही दुसरा काही पर्याय नसल्यामुळे आम्हाला तेच पाणी प्यावं लागलं.इथे वर्षातून एकदा किंवा दोनदा जत्रा भरते.त्यासाठी इथली स्थानिक माणसं जेवणाचं सामान घेऊन येतात, बकरी किंवा कोंबडीचा बळी देतात आणि स्वयंपाक करतात.त्यामुळे बरीच भांडी आणून ठेवलेली दिसतात.एकंदरीत वरची सगळी सोय पहाता तिथल्या लोकांसाठी ही गुहा चढणे म्हणजे एक किरकोळ डोंगर चढण्याइतकी शुल्लक बाब असावी असे वाटले.

दमल्यामुळे भूक नव्हती पण तरी आमच्यातील तिघेजण जेवण आणण्यासाठी परत खाली उतरले.त्यांच्या धाडसाचं खरंच कौतुक वाटलं मला कारण उतरायला परत १ तास आणि चढायला किमान २ तास लागणार होते.इथे एकदा चढेपर्यंतच माझी हालत खराब झाली होती.ते गेल्यावर मग आम्ही बाकीचे गप्पा मारत बसलो. थकव्यामुळे झोप कधी लागली कळलचं नाही. सकाळी आकाशातून एखादं विमान यावं आणि मला घेऊन जावं असंच राहून राहून वाटतं होतं.२ च्या सुमारास जाग आली तेव्हा जेवण घेऊन ते तिघे आले होते. फारशी भूक नसतानाही त्यांनी एवढ्या लांब जाऊन आणलय म्हणून मग सगळे जेवलो आणि मिळेल त्या जागेवर पसरलो.

सकाळी ६ ला जाग आली तेव्हा आपण कुठे आहोत ते कळलं. बाहेरच दृश्य बघून आलो ते बर झालं असं वाटलं.
खूप छान दिसत होता आसपासचा परिसर. कोवळं उन्हं पसरलं होतं सगळीकडे. पण मग माझ्या स्वभावानुसार लगेच आपण खूप उंचीवर आहोत हे लक्षात आलं आणि भीती वाटायला लागली. लवकर लवकर आवरून एक एक जण उतरायला लागला तशी माझ्या छातीतली धडधड वाढत होती

पण दोन काडीपैलवान मित्रांनी(धन्यवाद सनी आणि दिपक) मदत केल्यामुळे चढताना वाटली होती त्यापेक्षा कमी भीती मला उतरताना वाटली. त्यांच्याशिवाय खरोखर अशक्य होत उतरणं. हळूहळू एक-एक टप्पा उतरत उतरत डोंगरावर पोचलो. तर गावकरी आणि ७-८ वर्षांची मुलं गुहेकडे मोठमोठ्ठी लाकडं, जेवणाचं सामान, घेऊन निघालेली दिसली. त्या दिवशी जत्रा होती म्हणून ते सगळे गुहेकडे निघाले होते. इतकी उत्साही दिसत होती ती सगळी आणि पटापटा चढत होती की आम्हाला कौतुक वाटलं. अर्थात त्यांना काही हे फार अवघड नाही.

साधारण १० च्या सुमारास आम्ही गावात पोचलो. मग मस्त भरपूर वडापाव चेपून थोड फ्रेश होऊन पुण्याच्या दिशेने निघलो. लग्नानंतरचा माझा हा पहिलाच ट्रेक आणि तोही इतका अवघड. त्यामुळे मी खूप खूष होते. विश्वासच बसत नव्हता ४ वर्षांपासूनचा गाजलेला ढाकचा ट्रेक मी पूर्ण केला होता.

Tuesday, April 13, 2010

काटकोन त्रिकोण

काल ऑफ़ीस लवकर सुटल्यावर अमेयच्या डोक्यात पिक्चर बघायचा प्लॅन आला. म्हणून मग आम्ही प्रभात ला हुप्पा हुय्या बघायला गेलो. पण चित्रपटगृहात फ़ारशे गर्दी नव्हती. काय करावं कळेना. अचानक अमेयला सकाळी पेपरमध्ये पाहिलेली काटकोन त्रिकोण नाटकाची जाहीरात आठवली. प्रायोगिक नाटक असल्यामुळे आणि त्याबद्द्लचा काहीच रीपोर्ट माहित नसल्यामुळे मी तयार नव्हते. पण फ़क्त डॉ. मोहन आगाशे आहेत म्हणून तो जाऊयाच असं म्हणत होता. शेवटी असंतसं चित्रपटाला काहीच गर्दी नसल्यामुळे मी तयार झाले. (चित्रपट चांगला नसला तर उगाच नंतर शिव्या खायला नकोत हेही एक कारण.) बालगंधर्वला नऊलाच पोचलो. तिकीट काढताना लक्षात आलं ऐंशी नव्वद टक्के तिकीट आधीच संपली आहेत. मग मला बरं वाटलं आणि मी खुशीखुशीत तिकीटे काढली.

नाटकाची एकंदरीत कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फ़िरते. नवरा, बायको आणि सासरे(आबा) एकत्र राहत असतात. नवीन नवीन असताना सुनेचं आणि सासर्‍यांचं छान पटत असतं. पण तिची पार्टटाईमची नोकरी फ़ुल्लटाइम होते आणि मग घरचं वातावरण हळूहळू बदलायला लागतं.स्वयंपाकापासून सगळ्या कामांना बाई लावली जाते. भरमसाट कर्ज काढून बर्‍याच वस्तू घेतल्या जातात. हे त्या जुन्या विचारांच्या आबांना पटत नाही. मग त्यांची आणि सूनेची भांडणं व्ह्यायला लागतात. या सगळ्या प्रकरणात मुलगा त्रयस्तपणे सांगतो. दोघेही त्याला आपलंच कसं बरोबर आहे ते पटवत रहातात. सून आणि सासर्‍यांमधलं अंतर दिवसेंदिवस वाढत जातं. पण एक दिवस अचानक आबा गॅलरीतून पडून त्यांना गंभीर जखम होते. त्यांचा हा अपघात होता का आत्महत्या का खूनाचा प्रयत्न.. या रहस्यावर आधारीत हे नाटक आहे.

नाटकाची सुरुवातच पोलीस अपघाताच्या चौकशीसाठी घरी येण्याने होते. पुढे सारी कथा हळूहळू फ़्लॅशबॅकच्या रुपाने समोर येऊ लागते. हल्लीच्या पिढीच्या एकत्र कुटुंबातील समस्यांवर हे कथानक आधारीत आहे. साधा सरळ सुटसुटीत विषय असूनही पटकथा, मांडणी, दिग्दर्शन आणि अभिनय यांमुळे नाटक एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले आहे. पटकथेतील काही मार्मिक संवाद भाव खाऊन जातात आणि त्यामुळे विषय जरी गंभीर असला तरी नाटक कुठेही कंटाळवाणं होत नाही.

भूमितीप्रमाणे काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी इतर दोन बाजूंपेक्षा जास्त असते. त्याप्रमाणे घरातल्या तीन कोपर्‍यांचा विचार करता, सून आणि आबा यांमधील अंतर जास्त होतं. या सार्‍या पार्श्वभूमीवर "काटकोन त्रिकोण" हे नाटकाला दिलेलं नाव साजेसं आहे.

केतकी थत्तेचं हे कदाचित पहिलंच व्यावसायिक नाटक माझ्या ऐकिवात असलेलं पण सूनेच्या भूमिकेत तिने उत्तम अभिनय केला आहे. हल्लीच्या नवविवाहित मुलींची मानसिकता तिने छान रंगवली आहे. नवर्‍याची भूमिका करणारे विवेक बेले हेच नाटकाचे लेखक आहेत. कात्रीत सापडण्याची नवर्‍याची अवस्था, मुलगा म्हणून आपण कमी पडलोय ही भावना, या सर्वांत त्याची होणारी घुसमट आणि यातूनच घरातील परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहण्याची त्याची धारणा हे सारं त्यांच्या अभिनयातून योग्य प्रकारे मांडलं जातं.आणि नाटकाचं ठळक आकर्षण असणारे डॉक्टर मोहन आगाशे हेच पोलीस आणि आबा अशा दुहेरी भूमिकेत आहेत. या दोन्ही भूमिका त्यांनी तितक्याच समर्थपणे आणि फरक लक्षात येईल अशा निभावल्या आहेत. डॉ. मोहन आगाशे यांना प्रत्यक्ष पाहण्याची ही माझी पहिलीच वेळ पण त्यांचा अभिनय मनाची पकड लवकर घेतो.

मराठी नाट्यसृष्टीत अजूनही उत्तम नाटकं होतात हे यावरुन सिद्ध होतं. प्रत्येकाने आपल्या घरच्या मंडळींबरोबर एकत्रितपणे बसून बघावं असं हे नाटक आहे असं मी आवर्जून सांगेन. नाटक संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. एक तृप्ततेची भावना सगळ्यांच्या मनात आली आणि एवढ्या चांगल्या नाटकाला आणल्याबद्द्ल मी अमेयचे आभार मानले. बाहेर येऊन आम्ही बराच वेळ नाटकाविषयी चर्चा करत होतो तेव्हा मोहन आगाशे आणि केतकी थत्ते (नाटकाच्याच वेषात) बाहेर आले. एकदम निवांत गप्पा मारत ती टू व्हिलर वरून आणि डॉक्टर आपल्या जुन्या मारुति ८०० मधून निघून गेले.

मराठी माणसं कितीही उंचीवर पोहोचली तरी त्यांना ग्लॅमर भावत नाही आणि ती साधेपणातच सुख मानतात या़चा पुन्हा एकदा प्रत्यय आला. आणि त्याच खुषीत आम्ही घरी परतलो.

या नाटकाची एक झलक इथे पहायला मिळेल. http://katkontrikon.blogspot.com/

Friday, April 9, 2010

रोजनिशी




काहीतरी लिहावं वाटतंय पण विषयच सुचत नाही, कुठेतरी सगळं बोलून टाकावं असं काहीसं. पण नक्की काय ? रोज ब्लॉगवर लोक इतकं काय काय लिहीत असतात. मला असं आतून कधीच काही सुचत नाही. आत्तापर्यंत मी फ़क्त प्रवासवर्णनच लिहिलं आहे.. नाही म्हणायला पुन्हा एकदा या वर्षी मी डायरी(दैनंदिनी/रोजनिशी)लिहायला सुरुवात केली आहे. पण ते काय रोज घडेल ते फ़क्त आपल्या शब्दात लिहायचं किंवा मनात आलेले विचार भराभरा डायरीच्या कागदावर उतरवायचे. याची एक गंमत असते पण. आपण जेव्हा अशा जुन्या डायऱ्या वाचतो तेव्हा फार गंम्मत वाटते. लहानपणापासून बाबांना डायरी लिहिताना पाहिलं होतं.त्यांच्या बऱ्याचशा मी वाचल्या पण आहेत. त्यामुळे असेल किंवा कुठेतरी कुणीतरी लिहीलेलं वाचलं होतं बहुतेक( मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली.पुस्तक वाचायचा छंद मला अगदी लहानपणापासून होता. आईकडून ठेवणीत मिळालेला , अनुवांशिकतेतून आलेला हा एकमेव ठेवा.),मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर दोन तीन वर्ष सलग लिहीली. परत बंद पडली, परत सुरु-बंद असा खेळ चालू होता. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा लिहायची तीव्र इच्छा झाली. म्हणून मग यावेळी असंच रोज काय होतंय ते लिहायला लागले. आणि हा प्रयत्न सध्यापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. कधी कधी चार-पाच दिवसांसाठी एकत्र लिहिते तर कधी रोजचं रोज.. पण काहीका असेना माझ्या समाधानासाठी लिहिते आहे हे महत्वाचं.

डायरी लिहायचे दोन फायदे आहेत - एक तर आपल्याला हे सगळं नंतर वाचताना खूप मजा येते आणि दुसरं म्हणजे खरंच मनात येईल ते रिकामं करता येईल अशी एक जागा. इतरांसारख्या मला कधी कविता सुचत नाहीत की साधा लेखही नाही कधी. पण म्हणून मग काहीच लिहू नये का ? मग निदान जे सुचतंय ते तरी लिहावं. मनात तर दर वेळी असंख्य विचारांची गर्दी झालेली असते. दरवेळी ते सगळेच्या सगळे आणि जसेच्या तसे कागदावर उतरतीलच असं नाही. पण काहीच नसण्यापेक्षा थोडंतरी या हेतूनं, काहितरी उतरतं या रोजनिशीमध्ये..

परवा असंच सगळं सामान आवरताना मला आठवीत लिहिलेली डायरी सापडली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. किती वेगळे होतो आपण, काहीही लिहायचो असं वाटलं. कधीतरी मिळणार्‍या दोन-चार रुपयांचं केवढं ते कौतुक असायचं तेव्हा. रोज काय घडलं , कुठे गेलो असं काय काय लिहिलं होतं मी त्यात. खर्चसुद्धा लिहायचे तेव्हा मी. जसं की सायकल मध्ये हवा भरली ५० पैसे. आता कसं वाटतं ना हे वाक्य वाचायला. हल्ली १ रुपयालाच मुळी किंमत नाही तर ५० पैशाची गोष्टच सोडा. आता ५० पैशाचं नाणं फ़क्त वेगवेगळी जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्या लोकांकडेच पहायला मिळतील. :-)

आज आईने काय केलं होतं खायला , कधी झोपलो असंही बरच काही लिहिलं होतं. आता खायच्या आणि झोपायच्या सगळ्याच सवयी बदलल्या आहेत. पूर्वी १ रू ला मिळणारी चटकदार भेळ आता २०-२० रु. देऊनसुद्धा खायला मिळत नाही. त्या वेळच्या चैनीच्या गोष्टी म्हणजे काय तर रंकाळ्यावर चालत फिरायला जाणे, तिथे जाऊन भेळ खाणे किंवा फार फार तर आईस्क्रिम खाणे. पण हल्ली हे सगळं दुर्मिळ झालं आहे आणि त्याची जागा मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या ५० रु. च्या पॉपकॉर्नने घेतली आहे. असो.

काही का असेना या आणि अशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला रोजनिशी सारखी एखादी संजीवनी गाठीशी हवीच. म्हणून मला वाटतं प्रत्येकाने आपल्या बिझी रुटीनमधून थोडा तरी वेळ काढून रोजनिशी निद्राधीन व्हायच्या आत लिहिली पाहिजे