Friday, April 9, 2010

रोजनिशी




काहीतरी लिहावं वाटतंय पण विषयच सुचत नाही, कुठेतरी सगळं बोलून टाकावं असं काहीसं. पण नक्की काय ? रोज ब्लॉगवर लोक इतकं काय काय लिहीत असतात. मला असं आतून कधीच काही सुचत नाही. आत्तापर्यंत मी फ़क्त प्रवासवर्णनच लिहिलं आहे.. नाही म्हणायला पुन्हा एकदा या वर्षी मी डायरी(दैनंदिनी/रोजनिशी)लिहायला सुरुवात केली आहे. पण ते काय रोज घडेल ते फ़क्त आपल्या शब्दात लिहायचं किंवा मनात आलेले विचार भराभरा डायरीच्या कागदावर उतरवायचे. याची एक गंमत असते पण. आपण जेव्हा अशा जुन्या डायऱ्या वाचतो तेव्हा फार गंम्मत वाटते. लहानपणापासून बाबांना डायरी लिहिताना पाहिलं होतं.त्यांच्या बऱ्याचशा मी वाचल्या पण आहेत. त्यामुळे असेल किंवा कुठेतरी कुणीतरी लिहीलेलं वाचलं होतं बहुतेक( मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली.पुस्तक वाचायचा छंद मला अगदी लहानपणापासून होता. आईकडून ठेवणीत मिळालेला , अनुवांशिकतेतून आलेला हा एकमेव ठेवा.),मी आठवीला असताना पहिली डायरी लिहायला सुरुवात केली. त्यानंतर दोन तीन वर्ष सलग लिहीली. परत बंद पडली, परत सुरु-बंद असा खेळ चालू होता. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा लिहायची तीव्र इच्छा झाली. म्हणून मग यावेळी असंच रोज काय होतंय ते लिहायला लागले. आणि हा प्रयत्न सध्यापर्यंत तरी यशस्वी झालेला आहे. कधी कधी चार-पाच दिवसांसाठी एकत्र लिहिते तर कधी रोजचं रोज.. पण काहीका असेना माझ्या समाधानासाठी लिहिते आहे हे महत्वाचं.

डायरी लिहायचे दोन फायदे आहेत - एक तर आपल्याला हे सगळं नंतर वाचताना खूप मजा येते आणि दुसरं म्हणजे खरंच मनात येईल ते रिकामं करता येईल अशी एक जागा. इतरांसारख्या मला कधी कविता सुचत नाहीत की साधा लेखही नाही कधी. पण म्हणून मग काहीच लिहू नये का ? मग निदान जे सुचतंय ते तरी लिहावं. मनात तर दर वेळी असंख्य विचारांची गर्दी झालेली असते. दरवेळी ते सगळेच्या सगळे आणि जसेच्या तसे कागदावर उतरतीलच असं नाही. पण काहीच नसण्यापेक्षा थोडंतरी या हेतूनं, काहितरी उतरतं या रोजनिशीमध्ये..

परवा असंच सगळं सामान आवरताना मला आठवीत लिहिलेली डायरी सापडली आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. किती वेगळे होतो आपण, काहीही लिहायचो असं वाटलं. कधीतरी मिळणार्‍या दोन-चार रुपयांचं केवढं ते कौतुक असायचं तेव्हा. रोज काय घडलं , कुठे गेलो असं काय काय लिहिलं होतं मी त्यात. खर्चसुद्धा लिहायचे तेव्हा मी. जसं की सायकल मध्ये हवा भरली ५० पैसे. आता कसं वाटतं ना हे वाक्य वाचायला. हल्ली १ रुपयालाच मुळी किंमत नाही तर ५० पैशाची गोष्टच सोडा. आता ५० पैशाचं नाणं फ़क्त वेगवेगळी जुनी नाणी गोळा करण्याचा छंद असलेल्या लोकांकडेच पहायला मिळतील. :-)

आज आईने काय केलं होतं खायला , कधी झोपलो असंही बरच काही लिहिलं होतं. आता खायच्या आणि झोपायच्या सगळ्याच सवयी बदलल्या आहेत. पूर्वी १ रू ला मिळणारी चटकदार भेळ आता २०-२० रु. देऊनसुद्धा खायला मिळत नाही. त्या वेळच्या चैनीच्या गोष्टी म्हणजे काय तर रंकाळ्यावर चालत फिरायला जाणे, तिथे जाऊन भेळ खाणे किंवा फार फार तर आईस्क्रिम खाणे. पण हल्ली हे सगळं दुर्मिळ झालं आहे आणि त्याची जागा मल्टिप्लेक्स मध्ये मिळणाऱ्या ५० रु. च्या पॉपकॉर्नने घेतली आहे. असो.

काही का असेना या आणि अशा जुन्या आठवणींना उजाळा द्यायला रोजनिशी सारखी एखादी संजीवनी गाठीशी हवीच. म्हणून मला वाटतं प्रत्येकाने आपल्या बिझी रुटीनमधून थोडा तरी वेळ काढून रोजनिशी निद्राधीन व्हायच्या आत लिहिली पाहिजे

3 comments:

  1. wah. hehi mast ekdam.
    जुन्या आठवणींना उजाळा द्यायला रोजनिशी सारखी एखादी संजीवनी गाठीशी हवीच.
    kharach pratyekane rooj lihavich..

    ReplyDelete
  2. kharch vachun majhya pan junya aathvni tajya jhalya.. really thnks for tht..:)

    ReplyDelete